Sunday, November 28, 2010

मुलींना दिलासा देणारी ‘सुकन्या’

हर्षदा परब
मुंबई, दि. २८ - स्त्री अर्भकांचा मृत्यू रोखण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी सुकन्या योजना आणण्याचा विचार महिला व बालविकास विभागातर्फे सुरू आहे. ११४ कोटी रुपयांची ही योजना असून अर्थ मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवताच महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या योजनेचा आराखडा तयार असून अर्थ मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. या योजनेनुसार बीपीएल कुटुंबात मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या नावे सरकारतर्फे पाच हजार रुपये जमा करण्यात येतील. मुलीच्या अठराव्या वर्षानंतर तिला हे पाच हजार रुपये व्याजासह देण्यात येतील. परंतु त्यासाठी अठरा वर्षांपर्यंत मुलगी अविवाहित असणे आणि तिचे १२ वी पर्यंतचे किमान शिक्षण असावे अशी अट घालण्यात येणार आहे.
महिला आणि बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनीही अशा तर्‍हेच्या योजनेचा विचार सुरू असल्याचे मान्य केले आहे. आजही स्त्री भ्रुण हत्येचे प्रमाण मोठे आहे. तसेच अपुर्‍या आहारामुळे आजही मुलींचा मृत्यू होतो. जन्मलेली मुलगी कुटुंबावर भार होते आणि तिचा वापर घरातील काम करण्यासाठी होतो. परिणामी मुली शिक्षणापासून वंचित राहतात. या सर्वाचा विचार करून ही योजना आणण्यासाठी महिला व बालविकास मंत्री या नात्याने त्या उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

योजनेच्या काही अटी
* मुलगी ही पालकाचे पहिले किंवा दुसरे अपत्य असावे
* दुसर्‍या अपत्यावेळी जुळ्या मुली झाल्यास दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल
* मुलगी १८ व्या वर्षापर्यंत अविवाहित असावी
* मुलीचे किमान शिक्षण १२ वी असावे

Thursday, November 25, 2010

आता फक्त आठवणी...विरलेल्या


पण मुंबई बधिर नाही... 
हर्षदा परब
मुंबई, दि. २५ - रस्त्यावर बुलेटप्रूफ जॅकेट घातलेले पोलीस अचानक जरा जास्त दिसू लागले, सीएसटी स्टेशन, ऑॅबेरॉय आणि ताज हॉटेल, मंत्रालय अशा महत्त्वाच्या ठिकाणी चेकिंग वाढली... मग गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये झळकणार्‍या बातम्यांवरून लक्षात आले ‘२६/११’ च्या त्या दहशतवादी हल्ल्याला दोन वर्षे झाली. तेव्हा संपूर्ण जगात चर्चा झालेल्या हल्ल्याची आठवण आली...पण विरळ...
अरे उद्या ‘२६/११’ च्या हल्ल्याला दोन वर्षे होतील...
हो ना कशी दोन वर्षे झाली काही कळलंच नाही.
ट्रेन, बस, ऑॅफिसमध्ये आणि फोनवर रंगलेल्या या त्रोटक गप्पांमध्ये ‘२६/११’ च्या हल्ल्याचा उल्लेख आहे पण ओझरता...
खरंय...आता त्या हल्ल्याची आठवण आम्हाला तेव्हा येते जेव्हा कसाब काहीतरी वेडेवाकडे चाळे करतो, हल्ल्यानंतर बंद झालेला एखादा स्विट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी खुला होतो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शहीदांना श्रद्धांजली वाहतात, त्यांच्या नातेवाईकांशी बोलतात, आमचे काही मंत्री त्या कसाबला भेटतात, हेडली काहीतरी बरळतो, दहशतवादी हल्ला होणार असल्याचा एखादा मेल नाहीतर फोन सुरक्षा यंत्रणेला येतो, ‘२६/११’च्या हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार्‍या नुकसानभरपाईचा आढावा घेतला जातो, या हल्ल्यात शहीद झालेल्या उन्नीकृष्णनचे वडील सायकल रॅली काढतात... कोणीतरी त्यावर पुस्तक काढतो नाहीतर कविता करतो...
एरवी मुंबईला हादरवणार्‍या त्या क्रूर हल्ल्याची चर्चा ऐकू आली तर मुंबईकर दचकत नाही... त्याच्या काळजाचे ठोके वाढत नाहीत... इतर हल्ल्यांप्रमाणे हा एक हल्ला होता इतकीच त्याची नोंद आज सर्वसामान्यांच्या लेखी उरली आहे... याचा अर्थ मुंबई बधिर झालेली नाही, पण हा हल्ला आम्ही मनाला लावून खचलो मात्र नाही.
मोशेला आजही मुंबई आवडते, त्याचे आजी-आजोबा तो मोठा झाल्यावर त्याला मुंबईत पाठवणार आहेत. आजही मोशे रात्री झोपताना आपल्या आईवडिलांना गुडनाईट म्हणतो, उन्नीकृष्णनच्या वडिलांना मुलाच्या निधनाचा त्रास सहन होतो म्हणून खचून न जाता ते शहीदांच्या आठवणीत सायकल रॅली काढतात, छाबड हाऊसमध्ये शहीदांच्या स्मृतीत मेणबत्त्या लावल्या जातात, कसाबला फाशी व्हावी म्हणून मोठ्या धिटाईने लोक कोर्टात जाऊन साक्ष देतात... तेव्हा आमचे डोळे पाणवतात आणि आवंढा गिळता येत नाही...
त्यामुळे हल्ली या विरळ झालेल्या आठवणी आम्हाला सांगतात... ‘जिंदगीमे जितता वो नही जो जोर का मारे, जितता तो वो है जो उठकर फिर खडा हो...’ हो आम्ही जिंकलोय आणि ते जगालाही सहज दाखवून दिलंय... कोणत्याही शस्त्राशिवाय शत्रूवर केलेल्या या हल्ल्याने...