पण मुंबई बधिर नाही... हर्षदा परब

मुंबई, दि. २५ - रस्त्यावर बुलेटप्रूफ जॅकेट घातलेले पोलीस अचानक जरा जास्त दिसू लागले, सीएसटी स्टेशन, ऑॅबेरॉय आणि ताज हॉटेल, मंत्रालय अशा महत्त्वाच्या ठिकाणी चेकिंग वाढली... मग गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये झळकणार्या बातम्यांवरून लक्षात आले ‘२६/११’ च्या त्या दहशतवादी हल्ल्याला दोन वर्षे झाली. तेव्हा संपूर्ण जगात चर्चा झालेल्या हल्ल्याची आठवण आली...पण विरळ...
अरे उद्या ‘२६/११’ च्या हल्ल्याला दोन वर्षे होतील...
हो ना कशी दोन वर्षे झाली काही कळलंच नाही.
ट्रेन, बस, ऑॅफिसमध्ये आणि फोनवर रंगलेल्या या त्रोटक गप्पांमध्ये ‘२६/११’ च्या हल्ल्याचा उल्लेख आहे पण ओझरता...
खरंय...आता त्या हल्ल्याची आठवण आम्हाला तेव्हा येते जेव्हा कसाब काहीतरी वेडेवाकडे चाळे करतो, हल्ल्यानंतर बंद झालेला एखादा स्विट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी खुला होतो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शहीदांना श्रद्धांजली वाहतात, त्यांच्या नातेवाईकांशी बोलतात, आमचे काही मंत्री त्या कसाबला भेटतात, हेडली काहीतरी बरळतो, दहशतवादी हल्ला होणार असल्याचा एखादा मेल नाहीतर फोन सुरक्षा यंत्रणेला येतो, ‘२६/११’च्या हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार्या नुकसानभरपाईचा आढावा घेतला जातो, या हल्ल्यात शहीद झालेल्या उन्नीकृष्णनचे वडील सायकल रॅली काढतात... कोणीतरी त्यावर पुस्तक काढतो नाहीतर कविता करतो...
एरवी मुंबईला हादरवणार्या त्या क्रूर हल्ल्याची चर्चा ऐकू आली तर मुंबईकर दचकत नाही... त्याच्या काळजाचे ठोके वाढत नाहीत... इतर हल्ल्यांप्रमाणे हा एक हल्ला होता इतकीच त्याची नोंद आज सर्वसामान्यांच्या लेखी उरली आहे... याचा अर्थ मुंबई बधिर झालेली नाही, पण हा हल्ला आम्ही मनाला लावून खचलो मात्र नाही.
मोशेला आजही मुंबई आवडते, त्याचे आजी-आजोबा तो मोठा झाल्यावर त्याला मुंबईत पाठवणार आहेत. आजही मोशे रात्री झोपताना आपल्या आईवडिलांना गुडनाईट म्हणतो, उन्नीकृष्णनच्या वडिलांना मुलाच्या निधनाचा त्रास सहन होतो म्हणून खचून न जाता ते शहीदांच्या आठवणीत सायकल रॅली काढतात, छाबड हाऊसमध्ये शहीदांच्या स्मृतीत मेणबत्त्या लावल्या जातात, कसाबला फाशी व्हावी म्हणून मोठ्या धिटाईने लोक कोर्टात जाऊन साक्ष देतात... तेव्हा आमचे डोळे पाणवतात आणि आवंढा गिळता येत नाही...
त्यामुळे हल्ली या विरळ झालेल्या आठवणी आम्हाला सांगतात... ‘जिंदगीमे जितता वो नही जो जोर का मारे, जितता तो वो है जो उठकर फिर खडा हो...’ हो आम्ही जिंकलोय आणि ते जगालाही सहज दाखवून दिलंय... कोणत्याही शस्त्राशिवाय शत्रूवर केलेल्या या हल्ल्याने...