तीन महिन्यात किमान 20 वेळा हृदयविकाराचे झटके
तरिही बाळ सुखरूप
आई सुशिक्षित असल्यामुळे बाळ वाचले डॉक्टरांची प्रतिक्रिया
सकाळ वृत्तसेवा,
वृत्तसेवा,
मुंबई, ता. 2ः अवघ्या तीन महिन्यात बाळाला सुमारे 20 किंवा त्याहून अधिक हृदय विकाराचे झटके आले असावेत असा डॉक्टरांचा अंदाज आहे. इतक्या बिकट प्रसंगानंतरही अवघ्या तीन महिन्यांची आदिती गिलबिले जिवंत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार याचं पूर्ण श्रेय तिच्या आई-वडिलांचं आहे. आई वडील सुशिक्षित होते म्हणून बाळ वाचलं.
सोलापूर येथील बार्शी मधील गिलबिले कुटूंबात 25 नोव्हेंबरला आदितीचा जन्म झाला. सतत घाम येणे, दूध पिताना तासन तास रडणे, दूध न पिणे या समस्यांमुळे आदितीला डॉक्टारांकडे वारंवार न्याव लागत होतं. जानेवारी महिन्यात आदितीला हृदयाचा अत्यंत बिकट आजार असल्याचे उघड झाले. औषधोपचारांनंतरही आदितीमध्ये बदल दिसत नव्हता. सरते शेवटी बार्शीहून आदितीला तिच्या कुटूंबियांनी पूण्याच्या हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात नेले. तिथल्या डॉक्टरांनी आदितीवर उपचार होतील पण त्यात तिची जिवंत राहण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले. तेव्हा आदितीची आई प्रिती गिलबिले यांनी आदितीला मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला.
खासगी वाहनाने आदितीला मुंबईत आणण्यात आले. नातेवाईकांच्या सांगण्यावरुन एच.एन. रिलायन्स रुग्णालयात तिला दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी आदितीच्या चाचण्या केल्या असता आदितीवर तातडीची शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्यानुसार आदितीवर 25 फेब्रुवारीला शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी हृदयातील शुद्ध रक्त फुप्फुसात सोडणाऱ्या धमनीला योग्य ठिकाणी जोडण्यात आले. 9 तासांच्या शस्त्रक्रियेदरम्यान आदितीच्या हृदयाच्या एका बाजूला यंत्राच्या आधारे काम करण्यास प्रवृत्त करण्यात आलं. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. एका वेळी आदितीचे हृदय, फुप्फुसं आणि तिच्या शरिरातील कॅल्शियम, क्षारांचे प्रमाण नियंत्रित करावे लागत होते असे या शस्त्रक्रियेतील प्रमुख डॉ. के शिवप्रकाश यांनी सांगितले.
अनकेदा आदिती तीन ते चार तास रडायची. कळायचं नाही ती का रडते. तिला आजार होता हे समजलं तेव्हा आदितीला वाचविण्यासाठी आम्ही सात ते आठ डॉक्टरांकडे गेलो. बार्शीला शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं कळलं तेव्हा पुण्याला शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेताल. पुण्यात हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात बाळावर उपचार करण्याची तयारी दाखविली पण बाळ वाचण्याची हमी ते देत नव्हते. या रुग्णालयात ती हमी मिळाली म्हणून आम्ही इथे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला डॉक्टरांमुळे माझं बाळ वाचलं असे आदितीची आई प्रिती गिलबिले यांनी सांगितले.
आई शिकलेली होती म्हणून
एका मुलीला घेऊन बार्शीहून मुंबईत यावं लागणं हे असंघटित आरोग्य सेवेचं लक्षण आहे. आदितीच्या माता-पित्यांनी वेळीच तिला रुग्णालयात आणलं आणि शस्त्रक्रियेचा निर्णय घेतल्याने आदिती वाचली. आदितीचे आई-वडील सुशिक्षित होते त्यातही आई शिकलेली होती म्हणून आदिती वाचली असं मी म्हणेन. आदिती तिच्या वयाच्या सहा महिन्यानंतर आली असती तरी आदितीला जगली नसती. आदितीच्या आजारामुळे तिची शुद्ध रक्त शरिरात सोडण्याची प्रक्रिया मंदावत चालली होती. ज्याचा परिणाम हृदयाच्या काम करण्याचा क्षमतेवर होत होता. आदितीवर वेळीच शस्त्रक्रिया झाली नसती तर आदिती जगली नसती. आता आदिती सर्वसामान्य माणसाप्रमाणे जीवन जगू शकते- डॉ. शिवप्रकाश के.
चौकट
आदितीला अल्कापा हा हृदयाचा अत्यंत दूर्मिळ आजार होता. या आजारामध्ये हृदयाची रक्तपुरवठा करणारी धमनी फुप्फुसांमध्ये रक्त सोडत होती. याने हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि हृदयाचे, स्नायू मृत झाल्याने हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता भासते.
एकूण हृदयविकारांच्या तुलनेत या आजाराचे प्रमाण .025 टक्के ते 0.5 टक्के आहे.
तीन लाखात एकाल हा आजार होतो.
हा आजार झालेले 10 पैकी 9 मुलांचा मृत्यू जन्मानंतर एक वर्षात होतो
वयस्कर व्यक्तींमध्ये या आजाराला हृदय प्रत्यारोपण हाच पर्याय आहे
डॉ. श्रीपाल जैन, बालहृदयरोगतज्ज्ञ
घाम येणे, न जेवणे आणि सतत रडणे या साधारण समस्या आहेत. पण जर मुलाचं वजन वाढत नसेल आणि या समस्या दिसत असतील तर मुलाला हृदयविकार असल्याची शक्यता असते. अनेकदा डॉक्टरांच्या हे लक्षात येत नाही. अशी बाळ जेव्हा दमतात किंवा रडतात तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका येतो - डॉ. अनिष वोरा


No comments:
Post a Comment