सामनात आल्यापासून ललित लेखनाची संधी पुन्हा मिळाली... अगदी प्रत्येकाने विश्वास ठेवून मला माझ्या आवडीप्रमाणे विषयांवर लिहायची संधी दिली. त्यात सर्वात आधी नाव विद्याधर चिंदरकर सरांचं घेईन... त्यांनी माझ्या लेखनावर विश्वास ठेवून मला वारंवार लिहितं करुन माझ्यातल्या वेगळ्या गुणाची ओळख मला आणि माझ्या ऑफीसमधल्या कलिगना करुन दिली. माझी सामनातील मैत्रिण श्वेता पवार आणि तिची बॉस श्वेता प्रधाने यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. श्वेता(पवार) मला फोनवरुन आर्टीकलसाठी एखादा विषय देते आणि त्याला जोडून तुझ्या स्टाईलमध्ये लिही... आणि रविवारपर्यंत दे... असं आवर्जून सांगते. पहिलं आर्टीकल सोडलं तर त्यानंतर कधीच तिला रविवारी आर्टीकल मी दिलेलं नाही. पण तरीदेखील ती माझ्याकडून लिहून घेते त्यामुळे गेले दोन आठवडे हर्षदा खूप खूष आहे.. तिला तिच्या मनासारखं लिहायला मिळतंय... प्रभाकर पवार सर, जोशी सर, डहाळे सर, मंगेश वरवडेकर, जयेंद्र
लोंढे, इंद्रायणी मॅडम, नवीन
आलेली तेजश्री सगळेच लिहिलेलं आवडलं की आवर्जून सांगतात...
'जागा भरण्यासाठी' किंवा 'मनाचे श्लोक' असे काही जण त्या लिखाणाला हिणवतात... पण मला वाटतं मनाचे श्लोक लिहायला रामदास स्वामी व्हायला लागतं... असा विचार करुन मी त्याकडे दुर्लक्ष करते... आणि प्रशांतसुद्धा (माझा नवरा) याला दुजोरा देतो... त्यामुळे हर्षदा आणखी खूष आहे...गेले दोन आठवडे जे मी फुलोरामध्ये लिहीलं किंवा यापूढे लिहीन ते
माझ्या वाचकांसाठी आणि मित्रांसाठी मी मुद्दाम ब्लॉगवर टाकतेय... या लिखाणाबद्दल जरुर तुमच्या 'मनाते श्लोक' कळवा...
.....................,...............................................................................................................................................
(लेखाला सुरूवात)
देवा मला पाव
मनी नाही भाव
देवा मला पाव
देव अशाने पावायचा नाही रे
देव बाजारचा भाजीपाला नाही रे...
हो पण हे लोकांना समजवायचं कोणी...
हात जोडले की देवाला आठवण्यापेक्षा तो काय देऊ शकेल आणि त्या बदल्यात त्याला काय
द्यायचं हेच आठवण्याच्या त्याच्या प्रत्येक भक्ताचा वेळ जातो हल्ली.... काय खरंय
ना?
देवा मला शेजारची प्रिया पटली तर
यावर्षी अनंतचतुर्दशीपर्यंत बाटलीलासुद्धा हात लावणार नाही... देवा मी यावर्षी
चांगल्या मार्कांनी पास झाले तर 21 मंगळवार करेन... माझ्या मुलीला मुलगा
झाला तर तुला सोन्याचा नारळ देईन, यावर्षी माझं घर झालं तर तुला 1001 काजूचे लाडू देईन...
सव्वा रुपयांपासून
सव्वा कोटीच्या हारापर्यंत काहीही देण्याची तयारी दाखवत भक्त यथामती यथाशक्ती
देवाला आमिष दाखवत ठिकठिकाणी फिरत असतात. देवासमोर कुटले जाणारे टाळ आणि वाजणा-या
घंटा यांच्या जोडीला देवाचे कान आणि डोकं बधिर करणारे हे नवस सायास माळरानावरच्या
म्हसोबापासून ते अगदी दक्षिणेतल्या बालाजी पर्यंत आणि रस्त्यारस्त्यावर थाटलेल्या
देऊळ वजा दुकानांपर्यंत सगळीकडे वसलेल्या देवांच्या जणू पाचवीलाच पूजले आहेत.
बदलत्या
काळानुसार जग झपाट्याने बदलतंय. घराच्या देव्हा-यातला देवही आता थ्रीडी झाला. पुजेत
शॉर्टकट आला आणि प्रसादात फ्युजन आलं. पूर्वी देवाची तपश्चर्या करुन देवाला
प्रसन्न करायचं. त्याने वर दिला की तात्काळ तो प्रकट होऊन भक्ताकडून त्या बदल्यात
काहीतरी मागायचा. काळ बदलला तरी लोकांची मानसिकता त्यांची श्रद्धा बदलली नाही.
इंटरनेट, चॅटिंगच्या काळात ऑनलाईन आरती आली आणि टेलिपॅथी(?)च्या आधारे नवस होऊ लागले. देवाला मनोमन ‘इनशॉर्ट’ नवस करुन लोकं त्यांच्या मनात येतील ते त्या बदल्यात त्याला कबूल करू लागले.
मग
मंत्रालयातली फाईल पुढच्या टेबलवर जाण्यासाठी ते लग्नानंतरचं दुसरं अफेअर
लपविण्यासाठी सगळ्याप्रकारचे नवस देवाला होऊ लागले. आता नवस पूर्ण झाल्यावर
देवालाच काहीतरी द्यायचं असं थोडी आहे. मंडळ, देऊळ, भटजीबुवा, एखादा अनाथ, अपंग,
भिकारी अशा कोणाला तरी त्या नवसाचं दिलं जातं. लोकांची मानसिकता हो. आम्ही एका
गरीबाला दान दिलं बुवा... असं सांगताना नाकं उडवत मनातल्या मनात केलेला नवस फेडला
नारे देवा किंवा देवी असं म्हणणारे ‘हाय सोसायटी’ लोक आहेतच की समाजात.
आता एखाद्याने आपलं काम केलं की आपण
त्याला त्याच्या उपयोगी येणारी वस्तू देतो ना. मग देवाने आपलं एखादं मागणं पूर्ण केलं तर आपण त्याला हार,
नारळ, सोन्या-चांदीच्या वस्तू, फूलं, फळं असं काहीसं द्यायला नको का... पण छे
आजूबाजूचं जग आपल्यात इतकं एकवटलेलं असतं की देवाला त्याच्या आरतीच्या हजार सीडी, त्याचा
प्रसाद वाटण्यासाठी ताटं, पिशव्या, त्याचा होम करण्यासाठी हवन कुंड, त्याच्यासमोर
लावायचा दिवा, त्याच्या समोर वाजवायला वाजंत्री, त्याच्या भेटीला येणा-या भक्तांना
अन्न... म्हणजे काय तर काम करुन घ्यायचं देवाकडून आणि खूष करायचं त्याच्या
अवती-भवती घुटमळणा-या, त्यालाच नवस करायला आलेल्या त्याच्या भक्तांना. भक्तांच्या
सोयीसाठी काहीतरी देवाच्या नावाने द्यायचं. हे म्हणजे कमालच झाली. आता आपल्यात
राहून देव आपल्यासारखाच झाला तर म्हणत असेल ‘साला याला दिलं मी
आणि हा देतो या माणसांना. येऊ देत पुढच्या वेळेला चांगला घेतो याला.’
ऑल ड्यू
रिस्पेकट देवाच्या मनातलं इथे मांडलं. काय माहिती त्याच्या मनातलं मांडलं म्हणून
काही न घेताच तो माझा एखादा नवस पूर्ण करेल.... होय महाराजा !

No comments:
Post a Comment