Thursday, March 29, 2018

सायमन टॉफेल आणि मी... मग तो सिमॉन होतो

हा फोटो दिसतोय? त्यात काय दिसतंय? तीन चिअर लिडर आणि प्रत्येकीच्या बाजूला एक अम्पायर. असा एक फोटो त्याने दाखवला. मग त्याने सांगितलं एका अम्पायरने एका मुलीच्या कंबरेत हात घातलेत. दुसऱ्याने तिच्याकडे न पाहता शरिराच्या एका भागाकडे पाहिलंय आणि मी माझे हात दिसताहेत? पोरं जाम हसली आणि मी सुद्धा फुटले... खळखळून हसले. मागोमाग शब्द आला. 'फोकस', 'यू मस्ट फोकस्ड ऑन यूअर गोल' मुलं लक्ष देऊन ऐकू लागली. मी अम्पायरिंगमध्ये आलो ते मुली, खुबसुरत लडकी (ही अॅक्चुअली युस्ड दिस हिंदी वर्डस), पैसा किंवा मान सन्मानासाठी नाही तर मला उत्तम अम्पायर बनायचं होतं म्हणून. पैसे कमवण्यासाठी नोकरी करत असाल तर तुम्ही दमून जाल. त्याऐवजी तुम्ही आनंदासाठी नोकरी करा. तुम्ही त्यात नवीन काहीतरी कराल, आनंदी रहाल. सिमॉन टॉफेल (येस अॅक्चुअली सायमन टॉफेल) बोलत होता. त्याच्या लेक्चरच्या सुरुवातीलाच त्याने पकड घेतली होती. 

भाई जोरदार वाटला. पोरं खुष होतीच.पण आता मी सुद्धा खुर्चीत सावरुन बसले. इतकं मोकळं लेक्चर असेल तर त्या लेक्चरमध्ये जगण्याचा आणि यशाचा वास्तववादी मार्ग दाखवणार याची खात्री असते, हे माझं सुत्र. ते सायमनच्या निमित्ताने पुन्हा एकदा खरं ठरलं. 

सायमन टॉफेल 20 मार्चला मुंबईतल्या व्हिजेटीआयच्या टेक्नोवॅन्झा फेस्टमध्ये लेक्चर देण्यासाठी आला होता. ते लेक्चर मी अटेंड केलं. क्रिकेटबद्दल मला जरा जास्तच तिडीक आहे. का माहित नाही पण आहे. नुसतं गंमत म्हणून बॅटबॉल खेळायला आवडतं.  सायमन टॉफेल च्या व्हिजेटीआयच्या लेक्चरला जायची असाईनमेंट लागली. मी भलतीच खुष झाले. सायमन टॉफेल हा अप्मायरिंगमधला 'परफेक्शनिस्ट' हे प्रशांतच्या तोंडून कधीतरी ऐकलं होतं. मग असाईनमेंट लागल्यावर मी गुगलही केलं. तर आयसीसीच्या अम्पायर ऑफ द इयर चा सन्मान पाच वेळा पटकावलेला अम्पायर त्याला ऐकायची संधी मिळणं म्हणजे परवणीच. मी मनोमन विचार केला हे लेक्चर क्रिकेटवर नसावं नाहीतर मला वेड लागेल. 
पण, जेव्हा तो आला त्याच्या  अत्यंत साधेपणामुळे ये कुछ अलग करेगा असं वाटलं. अनेकदा असं वाटल्यावर फसगतही होते हा अनुभव असल्याने अजून छान वाटत नव्हतं. काही नाही तर आपण त्याला पाहिलं असं तरी सांगता येईल हा दुसरा विचार मनात होता.

 'नमस्ते' या शब्दाने त्याने बोलायला सुरुवात केली. एक दोन वाक्य बोलून त्याने 'मी फास्ट बोललो तर सांगा कारण ऑस्ट्रेलियातल्या लोकांना फास्ट बोलायची सवय असते. माझा अॅक्सेण्ट ठीक आहे ना?' असा प्रश्न करुन त्याने त्याच्या लेक्चरला सुरुवात केली. खुप हिंदी शब्द तो बोलला. फोटो च्या माध्यमातून किस्से  सांगत त्याने त्याच्या अंपायरिंग क्षेत्रातल्या यशाचा मंत्र लोकांना दिला. 

यावेळी त्याने मुनाफ पटेलचा किस्सा सांगितला. हा किस्सा लक्षात ठेवला म्हणजे सिमॉनच्या तोंडातून आलेली साला चुतिया ही शिवी . कॉलेजच्या आवारात लेक्चररने साला च्युतिया देण्याची ही माझ्या आयुष्यातली ही दुसरी वेळ (मी एका लेक्चरमध्ये चुतिया हा शब्द वापरला होता ;) शिवी न देताही मला बोलता येतं. खात्रीने सांगतेय ;) असो..) मुनाफ बॉलिंग करत होता आणि  साऊथ आफ्रिकेचा बॅटिंग करणाऱ्या खेळाडूला (मला त्याचं नाव नाही लक्षात राहिलं सॉरी) त्याने साला चुतिया अशी शीवी दिली. त्यावेळी सिमॉन अंपायरिंग करत होता. सिमॉनने सांगितलं पलिकडचा कोणीतरी हिंदी माहिती असणारा खेळाडू होता आणि त्याने मुनाफला त्याने दिलेल्या शिवीबद्दल विचारलं. सायमनने तेव्हा सांगितलं मुनाफ आणि त्याचे चांगले रिलेशन आहेत. तेव्हा ते दोघं एकमेकांना साला असं हाक मारतात. 

त्याच्या आवडत्या अम्पायरिंग हॅटबद्दलही त्याने सांगितलं.क्रिकेटीयर असलेल्या गाडीवर जेव्हा फायरिंग झालं तेव्हा खाली वाकून त्याने कसा जीव वाचविण्याबरोबर  त्याची अम्पायरिंग कॅप चुरगळू नये म्हणून प्रयत्न केला वगैरे हे सुद्धा सांगितलं.  

त्याच्या बोलण्यातील काही हायलाईट्स - टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे. क्रिकेटमध्ये आलेल्या टेक्नॉलॉजीने अम्पायरिंग, निर्णय घेणं सोप्प झालंय. पण अम्पायरिंगसाठी अलर्ट आणि जागृत असलंच पाहिजे. प्रॅक्टीस करताना टेक्नॉलॉजीची मदत घ्यायला नको. 

क्रिकेटमधील मोठ्या खेळाडूंबद्दल त्याला काही प्रश्न विचारले तेव्हा 'मी खेळाच्या मैदानावर अंम्पायर असतो' असं बाणेदार उत्तर त्याने दिलं. 

बोलताना प्रत्येक वेळी तो 'ठीक है' असं विचारायचा. बरेच हिंदी शब्द त्याने यावेळी उच्चारले. 
  
बोलताना चेहऱ्यावर कोणताही माज नाही पण ठाम बोलणं. फक्त फोटो आणि अम्पायरिंग करताना आलेल्या अनुभवातून यशस्वी होण्याचे फंडे सांगत होता. छान वाटलं त्याला ऐकून. म्हणजे त्याला ऐकून मला स्पोर्टसाठीची बातमी लिहिण्याचा विश्वास मिळाला इतकं साधं आणि सोप्प बोलला हे वेगळं सांगायलाच नको. 

तर सायमन टॉफेल हे नाव अनेकदा उच्चारलं जात असतानाही कुठूनतरी माझ्या डोक्यात ते सिमॉन टॉफेल असं बसलं. ते कॉपीत उतरलं आणि ती कॉपी मी पुढे पाठवलीही. बातमी वाचणाऱ्या गौरव दिवेकरचं आणि इतरांचं डोकं भंजाळलंच असेल. पण असो हेल्थ, कम्युनिटी वगैरे बघणाऱ्या माझ्यासारख्या क्रिकेटव्देष्ट्या मुलीला  5 चं लेक्चर असल्याचं कळलं तेव्हा 4.30 ला हजेरी लावली आणि लेक्चर 6 नंतर सुरू झालं.मधला वेळ मी व्हिजेटीआयच्या कॅम्पसमध्ये दोन इंटरेस्टींग मुलांमध्ये बसून मी पत्रकार असल्याचं कळू न देता गप्पा मारल्या. हे काय कमी आहे काय? 
असो.. व्हिजेटीआयच्या कॅम्पसमध्ये ज्याचं लेक्चर ऐकायला गेले त्याच्याबद्दल अर्ध्या तासापूर्वी माहिती घेऊन बातमी कव्हर करणार होते. काय कळणार या लेक्चरमधलं असा प्रश्न मनात आला की लगेच मेंदूतून भ्रुम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म असं ऐकू येत होतं.  कॉलेजच्या तळमजल्यावरच्या एका खोलीत वाकून बघितलं तर मोठ्या मशिन्स दिसल्या. तेव्हाही तेच भ्रुम्म्म्मम्म्म. हे माहितीतूनच आलं होतं.  थ्री इडियट्समधला सीन. व्हायरसच्या दरवाज्यावर कोण मुतलं याचा शोध घेण्यासाठी वर्गात आलेला व्हायरसला  राजू रात्रभर अभ्यास करत होता असं रँछो जेव्हा सांगतो. तेव्हा  व्हायरस त्याला विचारतो ना -' इन धिस केस हाव डस इंडक्शन मोटर स्टार्ट्स' आणि राजू (शर्मन जोशी) जसं रात्रीची न उतरल्यामुळे भ्रुम्ममममममम म्हणतो. अगदी तसंच सुरू होतं. पण हा भ्रुम्म्म्मम्म्म्ममम्म् माझ्या मनातून सिमॉनने काढलं होतं. आय मीन सायमनने काढला होता.  

(त्यावेळी दोन बातम्या केल्या. त्यापैकी एक बातमीची लिंक देतेय. नक्की वाचा त्यात कळेल सायमन मराठी सुद्धा बोलला होता)

Friday, February 23, 2018

अवयवदान आणि माझे काही अनुभव

अवयवदान चळवळीने मुंबईत 2015 पासून वेग घेतला जेव्हा पहिली हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबईत पार पडली. त्यानंतर अवयदान आणि अवयवप्रत्यारोपणाबाबत ऐकत आले. या मागची शास्त्रीय माहिती घेण्यासाठी, डॉक्टर, यंत्रणा यांच्या भेटीगाठी तर झाल्याच पण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षा यादीत असलेल्या, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना आणि अवयदान केलेल्या कुटूंबांना भेटता आलं ऐकता आलं. सारं काही बातम्यांमध्ये देता येत नाही. पण अशा काही गोष्टी होत्या ज्यांनी मी माणूस म्हणून समृद्ध झाले. समाजाचा अभ्यास करताना मला या गोष्टींनी कायम वेगळा दृष्टीकोन दिला. 
प्रत्येक रुग्णाला आर्थिक आणि भावनिक आधाराची गरज असते. पण अवयव प्रत्यारोपणासाठी वाट पाहणाऱ्या किंवा अवयदान केलेल्या व्यक्तींशी भेटणं हे माझ्यासाठी प्रत्येकवेळी नाविन्यपूर्ण होतं ते त्यामागे दडलेल्या गोष्टींमुळे.  वैद्यकीय क्षेत्रातली अवयदान आणि प्रत्यारोपण चळवळ ही एक वेगळी भरारी आहे. पण या भरारीमागे माणूसकी आहे हे नाकारता येत नाही. किंबहूना माणूसकी नसेल तर ही भरारी फार उंच जाणार नाही असं मला यातून वाटत आलंय. 

इतर ठिकाणी बातमी आली होती. तरीही पार्थ राजवाडे या एक वर्षाच्या मुलाची बातमी करण्याचा निर्णय घेतला.
डोंबिवलीच्या पश्चिमेला स्टेशनपासून काही अगदी काही पावलं अंतरावर असलेल्या चाळीत मी शिरले. त्या छोट्याशा घरात जमिनीवर अंथरलेल्या गोधडीवर काही महिन्यांचं बाळ खेळत होतं. पार्थ राजवाडे. त्याचं पोट मोठं होतं, डोळे पिवळे होते. बाळ छान हसत होतं. अगदी इतर बाळांसारखं. त्याच्या आईशी बोलताना लक्षात आलं. पार्थसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून ते प्रयत्न करताहेत. बातम्यांमध्ये त्याचा उल्लेखही होता. या आर्थिक मदतीसाठी आलेल्या बातम्यांमुळे त्यांना मदत करण्यासाठी खुप लोक पुढे आले होते. त्यातलं एक कुटूंब डोंबिवली (पूर्वेला) राहणारं होतं. त्यांनी मदत करायची तयारी दाखिल्यानंतर राजवाडे कुटूंबियांनी त्यांना संपर्क केला. त्यांनी दर महिन्याला काही रुपये मदत करण्याची तयारी दाखवली. मदत करणारं कुटूंब डोंबिवली पूर्वेला राहत होतं. तेव्हा राजवाडे कुटूंबियांनी त्यांना भेटण्याचा निर्णय घेतला. जे राजवाडे कुटूंब त्यांच्या घरी गेलं तेव्हा पार्थच्या आईच्या लक्षात आलं की ते कुटूंब अत्यंत गरीब आहे. मोठं कुटूंब आणि एकटा कमावता माणूस, पण पार्थ लहान आहे आणि त्याला वाचविण्यासाठी त्याचे आई-वडील आर्थिक मदतीसाठी फिरताहेत हे कळल्याने त्या माणसाने मदत करण्यासाठी स्वखुशीने तयारी दाखविली होती. पार्थच्या आईने त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून मदतीची तयारी दाखविल्याबद्दल आभार मानले आणि मदत घ्यायला नकार दिला. 
हृदय प्रत्यारोपणासाठी सानिया खान दीड वर्षांपासून प्रतिक्षा यादीत आहे. तिचे वडील सरफराज खान घराला कलर काढतात. पूर्वी ते इतरांकडे काम करायचे. सानियाला डॉक्टरकडे नेण्यासाठी, तिला औषध वेळेवर देण्यासाठी घराच्या आसपास असावं लागतं. म्हणून मग ते स्वतः काम घेतात. ज्याने त्यांना फार काम करता येत नाही. प्रत्यारोपणापूर्वी रुग्णांना अनेक औषधोपचार सुरू असतात. सानियाला दररोज लागणाऱ्या औषधांचा खर्च शिवाय पंधरवड्यातून एकदा एक इंजेक्शन घ्यावं लागतं. त्या एका इंजेक्शनला सात हजार रुपये एवढा खर्च आहे. याव्यतिरिक्त 25 लाख रुपये त्यांना उभे करायचे आहेत सानियाच्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी. सरफराज खान यासाठी आर्थिक मदत कऱणाऱ्या सर्व संस्थांनमध्ये जातात. आम्ही जेव्हा एफबी लाईव्हसाठी त्यांच्याबरोबर बोललो त्यांनी ऑन कॅमेरा हे कबूल केलं की सानियाला सर्व जाती-धर्मातल्या लोकांनी मदत केली. 'मुसलमान आहे म्हणून मदत मिळणार नाही असं सुरुवातीला मला वाटलं होतं. पण, प्रत्यक्षात तसं झालं नाही. सानियाचे डॉक्टर अन्वय मुळे यांनी कधीच सानियाच्या तपासणीसाठी फी घेतली नाही. हे सांगताना सरफराजला त्याचे अश्रू आवरत नव्हते. जेव्हा जेव्हा आर्थिक मदत लागली सरफराज राहत असलेल्या वसईतील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्व धर्मातल्या लोकांनी त्यांना वेळोवेळी जशी जमेल तशी मदत केली. मुलीला जगविण्यासाठी दीड दमडी खिशात नसतानाही धडपडणाऱ्या बापाला आर्थिक मदतीबरोबर हा दिलासा खुप मोठा वाटतो. जिथे धर्म आणि जातीवरुन वाद होतात तिथेच दिसलेली ही माणूसकी कातळालाही पाझर फोडणारी आहे. 
के.ई.एम रुग्णालयात अवयदान केलेल्या कुटूंबियांचा विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी विरलेले कपडे घातलेला म्हातारा मला त्या सभागृहात दिसला. सरकारी रुग्णालयात दररोज जाणाऱ्या मला अशा माणसांची सवय आहे. श्रोत्यांमध्ये बसलेल्या त्या माणासाचं नाव अवयवदान करणाऱ्यांच्या यादीत पुकारलं तेव्हा मी त्याच्याकडे आश्चर्याने बघत राहिले. तो एका ईमारतीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो आणि त्याच्या कुटूंबातल्या तरुणपणी गेलेल्या त्याच्या कुठल्यातरी पाल्याचे अवयदान त्याने केल्याचं जाहीर केलं. तेव्हा मला मीच फाटकी वाटले. पायात स्लिपर असलेला तो म्हातारा एवढं मोठं दान करुन मोकळा झाला. त्याच्या खोबणीत गेलेल्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. पण त्याला त्याच्या भावना व्यक्त करता येतील एवढी पण त्याला अवयवदानाची माहिती नव्हती. मला विवेकनंदांची आठवण झाली 'दान करा.  ते दान केल्यानंतर ज्याला दान दिलं त्याने त्याचं काय केलं याचा शोध घेत बसू नकाही त्यांची शिकवण मी फक्त वाचली होती तो माणूस ती जगत होता.
2015 ला मुंबईत पहिलं हृदय प्रत्यारोपण झालं. त्यावेळी अनेकजण त्याच्या एक्सक्लुझिव्ह बातम्या करत होते. माझ्याकडे यातलं काही नाही म्हणून मला रुग्णाची एक्सक्लुझिव्ह बातमी आणायला सांगितलं. ते हृदय प्रत्यारोपण झालेल्या 31 वर्षाच्या तरुणावर झालं होतं. त्याच्या वडीलांच्या फोनवरुन संपर्क करुन मी रुग्णालयापर्यंत पोहोचले. रुग्णापर्यंत पोहचून पहिली एक्सक्लुझिव्ह स्टोरी मिळविण्यासाठी मी सज्ज होते. रुग्णालयात पोहोचले. त्याच्या आधीच्या कंपनीतली मी त्याची मैत्रिण आहे हे पटवून देण्यात मला यश आलं होतं. त्याच्याबरोबर रुग्णालयात त्याची काळजी घेण्यासाठी थांबलेली त्याची मैत्रिणी मला नेण्यासाठी खाली आली. आम्ही लिफ्टमधून गप्पा मारत तो असलेल्या फ्लोअरपर्यंत पोहोचलो. त्याच्यापर्यंत पोहोचलेले एवढ्यावरदेखील बातमी झाली असती. अगदी पहिल्या पानावर येईल अशी. पण मी त्या मुलाच्या काळजीने त्याच्या मैत्रिणीला खरं सांगून टाकलं. 'मी त्याची मैत्रीण नाही पत्रकार आहे आणि बातमी मिळविण्यासाठी आहे' असं सांगून टाकलं. त्याला अचानक धक्का बसला आणि काही चुकीचं घडलं तर या विचाराने मी तिला सर्व सांगून टाकलं. त्यावेळी तिने माझे दोन्ही हात हातात घेतले. मी केलेल्या चुकीबद्दल न रागवता, वेळीच तिच्याकडे खरं बोलल्याबद्दल तिने माझे आभार मानले आणि ती त्याची गर्लफ्रेण्ड असल्याचं सांगितलं. सगळी माहिती दिली. वरुन रुग्णालयातल्या कोणालाही हे न सांगण्याची विनंती केली कारण, तिथे नातेवाईकाशिवाय कोणालाही राहण्याची परवानगी नव्हती. 
जसे माझे अनुभव तसे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळाली. के.ई.ए.म रुग्णालयातील डॉ. चेतन कंथारिया यांनी सांगितलेला एक किस्सा. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना इम्युनो संप्रेसंट खुप मह्त्त्वाचे असतात. त्याचबरोबर मानसिक आधारही लागतोच हे ते सांगत होते. त्यावेळी त्यांनी एका रुग्णाचं उदाहरण दिलं. त्या मुलाला यकृत प्रत्यारोपणासाठी कोणीच पुढे येईना. शेवटी त्याच्या वडीलांनी त्याला यकृत दिलं. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या घरात प्रॉपर्टीवरुन वाद झाला. भावाने शस्त्रक्रिया झालेल्या मुलाला 'तुझ्यासाठी बरंच काही केलं पण तुला त्याची किंमत नाहीअसं त्याच्या तोंडावर बोलून दाखवलं. घरात झालेल्या या वादामुळे डिप्रेशनमध्ये गेलेल्या त्या मुलाने इम्युनो सप्रेसंण्ट औषधं घेणं सोडून दिलं. ज्याने त्याचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्या एका केसमध्ये एका पुरुषाने त्याची बायको यकृत द्यायला तयार आहे असं सांगून शस्त्रक्रियेची तयारी सुरू केली. अवयदान करणाऱ्या आणि प्रत्यारोपण होणाऱ्या अशा दोघांचेही समुपदेशन होते. जेव्हा ते अवयवदान नातेवाईकाकडून होणार असते अनेक तपासण्या आणि समुपदेशनाच्या सिटिंग्स होतात. डॉ. कंथारियांनी सांगितल्यानुसार त्या पुरुषासमोर त्याच्या पत्नीने अवयवयदानासाठी स्वखुशीने तयार झाल्याचे सांगितले. त्यानंतर जेव्हा रुग्ण आणि दाता याची वैयक्तिक समुपदेशन होतं त्यावेळी मात्र त्याच्या पत्नीने जबरदस्ती अवयदान करावं लागत असल्याचं सांगितलं. 'मला अनफीट जाहीर करा' अशी डॉक्टरांकडे विनवणी केली. ते अवयव प्रत्यारोपण झालं नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. 
याच रुग्णालयात एका मुलीचं मूत्रपिंड प्रत्यारोपण डॉ. निवृत्ती हासे यांनी केलं. त्या मुलीची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली होती. तेव्हा तिच्या कुटूंबियांनी बरेच महिने, वर्ष तिला मदत केली. डायलिसिससाठी तिच्याबरोबर येत. मात्र ज्यावेळी तिला अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करावी लागणार होती त्यावेळी मात्र तिच्या आई-वडीलांनी देखील तिची साथ सोडली. त्यांनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला नकार दिला. मुलीला जगायचं होतं. गरीब घरातली मुलगी होती. शस्त्रक्रियेसाठी लागणारे पैसे उभारण्यासाठीचं आव्हान ती कसं पेलणार, हा खर्च कसा होणार या चिंतेत तिला कोणी मदत करायला तयार होईना. तेव्हा डॉक्टरांनी पुढाकार घेऊन प्रतिक्षा यादीत तिचं नाव नोंदवलं. तिच्या औषधोपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून डॉक्टरांनी तिला मदत केली. या दरम्यान तिच्या वतीने संस्थांकडे आर्थिक मदतीसाठी कोणीच जाणार नव्हतं. पण त्या रुग्णाला त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी केलेली मदत त्या मुलीने शस्त्रक्रियेनंतर मी भेटले तेव्हा बोलून दाखविली. ती मुलगी आली तेव्हा तिचे नातेवाईक शस्त्रक्रियेपुरते आले होते. त्यानंतर ती तिच्या रुमममध्ये एकटी असयाची. माझं आज कोण माझ्याबरोबर नाही पण माझा देव माझा डॉक्ट माझ्याबरोबर आहे असं सांगत तिने त्या डॉक्टर हासेंच पाय धरले होते. मला देव समोर दिसत होता डॉक्टरच्या रुपात. त्यानंतर एक वर्षानंतर वगैरे असं एका प्रत्यारोपणावर बोलताना मी त्या मुलीबद्दल डॉक्टरांकडे सहज विचारणा केली. डॉक्टरांनी मला त्या मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. रुग्णालयातून गेल्यानंतर त्या मुलीला औषध तर मिळत होती पण पुरेस आणि चांगलं खायला मिळत नव्हतं. ज्याने ती घेत असलेल्या औषधांचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. ज्यात तिचा मृत्यू झाला.   
सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांची खंत वेगळीच असते. रुग्ण भरपूर असतात पण त्यांच्या खिशात पैसे नाहीत. शस्त्रक्रिया झाल्यानंतर एका ठराविक काळात रुग्ण रुग्णालयात राहतो त्यानंतर तो घरी गेला तर जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून कसं रोखायचं असा प्रश्न डॉक्टरांना सतावतो. लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉ. अजित सावंत यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये एका लहान मुलीवर मुत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. तिच्या घरात ती धरुन सहा मुलं आणि इतर लोक. सायनच्या झोपडपट्टीत ती मुलगी राहते. तिच्या नशिबाने तिला मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचे मूत्रपिंड उपलब्द्ध झाले होते. त्यानंतर ती घरी गेल्यावर तिच्यासाठी कोणतीही स्वतंत्र खोली, किंवा स्वच्छतागृह नाही मग तिला जंतूसंसर्गापासून दूर ठेवणं तिच्या कुटूंबियांच्याही आवाक्याबाहेरचं. पण डॉक्टरांनी त्यादिवशी भेटल्यावर सांगितलं अहो ती मुलगी आता धावण्याच्या स्पर्धेत भाग घेते. भेटली होती त्यादिवशी मला एका संस्थेने कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हा. डॉक्टरांना रुग्ण वाचल्याचा आनंद होता मात्र किती काळ तिला रुग्णालयातर्फे मदत मिळणार आणि किती वेळ ती जंतूसंसर्गापासून वाचत राहणार असं तिला वाटत राहिलं.  
सरकारी रुग्णालयातील रुग्णांच्या शस्त्रक्रियेचा खर्च, त्यांच्या औषधांचा आणि एका ठराविक काळापर्यंत त्यांच्या जेवणाचा खर्च निघेल यासाठी सामाजिक कार्यकर्ते संस्थांकडून या रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देतात. म्हणजे सरकारी रुग्णालयावर केवळ शस्त्रक्रिया करुन काम संपत नाही तर पुढे रुग्ण जगविण्यासठी जमेल ती धडपड करावीच लागते. 
हे झाले रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टरांचे किस्से मात्र जे अवयवदानासाठी रुग्ण आणि नातेवाईकांचं समुपदेशन करतात किंवा त्यासाठी समन्वयक म्हणून काम करतात त्यांचेही किस्से मोठे रोचक आहेत. मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचे अवयवदान झाले तर प्रतिक्षा यादीत नोंदलेल्या व्यक्तींवर शस्त्रक्रिया होण्यास कमी वेळ लागेल. तसंच जीवंत व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांना अवयव द्यावे लागणार नाहीत. सरकारी रुग्णालयात मात्र व्यक्ती मेंदू मृत व्यक्ती जाहीर करणं हे आव्हान असतं. अशी व्यक्ती आढळली तरी ती जाहीर करण्यासाठी यंत्रणा सज्ज करुन ते अवयव काढण्यापर्यंत लागणाऱ्या वेळेपूरता त्या रुग्णाच्या शऱिरातील अवयवांची काळजी घेण्यासाठी लागणारी यंत्रणा रुग्णालयांमध्ये नसते. एका समुपदेशकाच्यामते या एका रुग्णाला सांभाळण्यासाठी रुग्णालयातील सर्व यंत्रणा पणाला लागते. तेव्हा इतर रुग्णांना कोण सांभाळेल असा प्रश्न उभा राहतो. अशा वेळेस मेंदू मृत व्यक्ती जाहीर करण्याऐवजी इतर रुग्णांची काळजी घेण्यात सराकरी यंत्रणा झटत राहते. परिणामी एक व्यक्तीच्या शरिरातून मिळणाऱ्या 8 अवयवांना आणि त्यातून 8 जणांना जीवनदान मिळेल ही आशा फक्त आशा राहते. 
तर, दुसरीकडे ही सर्व यंत्रणा अद्ययावत असणाऱ्या खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना सर्व काही मिळण्याची खात्री मात्र, त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक भार ज्याला उचलालयला जमेल तो खरा सिकंदर अशी स्थिती. 
या दोन टोकांमधलं अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत असं राहून वाटलं. (हे आर्टीकल 23 फेब्रुवारी 2018 ला सकाळ वर्तमान पत्रात ओपेड पेजवर छापून आलं आहे. 

Tuesday, February 28, 2017

तिची जिद्द जगण्यासाठी, जगविण्यासाठी...




















                                                                                    शब्बो



हर्षदा परब
सकाळ वृत्तसेवा,
मुंबई, ता. 27: आईवर अॅसिड हल्ला झाला. त्यावेळी आईच्या मांडीवर असलेल्या अडीच वर्षांच्या शब्बो शेखवरही अॅसिड पडलं. तिची मानेपर्यंतची त्वचा जळाली. त्या घटनेनंतर तिने आई, कुटूंब सारं काही गमावलं. जिद्दीने जगणाऱ्या शब्बोला आता अॅसिड सर्व्हायवर्ससाठीच्या साहस फाउंडेशन संस्थेला मोठं करायचं आहे आणि अॅसिड सर्व्हायवर्सना त्यांचा हक्क, उपचार मिळावेत म्हणून काम करायचं आहे. 

अॅसिड हल्ल्यानंतर छोट्याशा शब्बोवर सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार झाले. कुटूंब गमावलेल्या चार वर्षांच्या शब्बोला नियमबाह्य (रुग्णाला उपचारांशिवाय ठेवता येत नाही) पद्धतीने रुग्णालयात आश्रय देण्यात आला. नंतर, तिला सरकारी आश्रमात ठेवलं. त्यानंतर पुढे श्री मानवसेवा संघ या खासगी आश्रमात ती वाढली. मानवसेवा आश्रमाने पंखांना बळ आणि जगण्याला स्वप्न दिली असं शब्बो सांगते. त्यांच्या मदतीने शब्बोने बीसीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. 68 टक्क्यांनी पास झालेल्या शब्बोला नोकरी मिळाली. तिने आश्रमातून बाहेर पडून स्वतःचं वेगळं विश्व निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नोकरी गेल्याने तिच्यावर आभाळ कोसळलं. हॉस्टेलवरच्या रुममेट ललिता गोमाने हिने शब्बोला वर्षभर मदत केली. या वर्षभरात शब्बोच्या कामाच्या अनुभवावर आणि गुणांवर तिला अनेक नोकऱ्यांचे कॉल आले. इण्टरव्ह्यूला चेहरा पाहून अनेकांनी नाकारलं. हे पहिल्यांदा झालं नव्हतं. शाळेतल्या मुलांना या चेहऱ्याची सवय होती म्हणून फार त्रास झाला नाही. कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र, विश्व बदललं. सर्वांनी नाकारलं, टाकलं, थट्टा केली. तेव्हा अभ्यासावर आणि गुणांवर परिणाम झाला होता. त्यावेळी क्रिना गांधी या आश्रमात येणाऱ्या शिकवणी शिक्षिकेने  'ध्येयावर लक्ष केंद्रीत कर' असा सल्ला दिला. त्या सल्ल्याने आयुष्यभराची शिकवण दिली. त्यानंतर डगमगले नाही असं शब्बो सांगते. 
खासगी आणि सरकारी बँकांकरीता क्रेडिट कार्डाच्या सेल्ससाठी काम करणाऱ्या स्कॉट कन्सल्टन्सी या प्रिती ठाकर अरोरा यांच्या कंपनीत शब्बो बॅक ऑफिस एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करते. कंपनीत 20 टक्के जागा अॅसिड सर्व्हायवर आणि शारिरीकदृष्ट्या विशेष व्यक्तींसाठी असल्याने ही नोकरी मिळाल्याचं शब्बो सांगते. रोजगार असला तरी खासगी कंपनीत, उपचारांसाठी घ्याव्या लागणाऱ्या सुट्ट्यांचा पगार कापला जातो. ती खंत व्यक्त करते.  
तिच्या चेहऱ्याची त्वचा मानेपर्यंत जळली आहे. वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा डावा डोळा पूर्ण निकामी झाला आहे. तिला अन्न गिळायलाही त्रास होतो. न केलेल्या गुन्ह्याची आयुष्यभर शिक्षा भोगणार नाही या निश्चयाने बालपण हिरावून घेणाऱ्या त्या घटनेचा पाठपुरावा शब्बोनो सुरू केला आहे. शब्बो सचिव असलेल्या अॅसिड सर्व्हायवर्स साहस फाउंडेशन या संस्थेच्या प्रमुख दौलतबी खान यांनी शब्बोच्या केसची एफआयआर कॉपी मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. एफआयआरची कॉपी हातात मिळाल्यावर स्वतःच्या हक्कांसाठी लढणार असं शब्बो सांगते. स्वतःच कुटूंब, आई गेल्यावर हॉस्पिटलमध्येही न परतलेले बाप, आयुष्यभरासाठी जखमा देणारा अॅसिड अटॅकर या सर्वांचा काय झालं ते जाणून घेणार असं ती सांगते.
 


'पाच महिन्यांपासून एक एफआयआरची कॉपी शोधतो आहोत. माहितीचा अधिकार, पोलिस स्टेशनमधील चकरांनतर फक्त एफआयआर नंबर आणि हल्लेखोराचं नाव एवढचं हाती लागल्याचं दौलतबी सांगते. नवऱ्याने सोडून दिलेल्या, तीन मुलांची एकल माता असलेल्या दौलतबीने शब्बोला तिच्या घरात ठेवून घेतलं आहे. पैसे भरुनही भाड्याचं घर मिळत नाही. रस्त्यावर राहता येत नाही म्हणून हा हक्काचा पर्याय असं शब्बो हसत सांगते. 

योगायोग
सेहतर्फे आयोजित एका परिषदेत शब्बोची केस सायन रुग्णालयाच्या बर्न विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. माधवी गोरे यांनी सादर केली. त्यावेळी त्या परिषदेत शब्बो असल्याचं त्यांना माहित नव्हतं. ही भेट एक योगायोग असल्याचं शब्बो सांगते.   

आज मुख्यमंत्री बंगल्यावर होत्या त्या
अमृता फडणवीस आयोजित करत असलेल्या फॅशन शो मध्ये शब्बो आणि दौलतबी सहभागी होणार आहे. 5 मार्च रविवारी होणाऱ्या या फॅशन शोसाठी त्या दोघी उत्सुक आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर चहा प्यायल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यांवर दिसत होता. मात्र हक्कासाठी लढण्यातही राजकारण्यांची आणि मोठ्या व्यक्तींची मदत व्हायला हवी असं दौलतबी सांगते.   

एनजीओ फक्त आमचा वापर करतात 
अॅसिड सर्व्हायवर्ससाठी काम करणाऱ्या संस्था आहेत. मात्र, त्या सर्व्हायवर्सचा वापर फंडसाठी करतात. मिळणारे पैसे वाटून घेतात आणि सर्व्हायवर्सना विसरून जातात. गरज असते तेव्हा वापर व्हावा म्हणून सर्व्हायवर्सकडे बघण्याची वृत्ती थांबवायची आहे. यासाठी सर्व्हायवर्सनी मिळून स्थापन केलेल्या साहस या संस्थेच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे. केवळ अॅसिड सर्व्हायवर्स, बलात्कारपिडीत, विधवा अशा वंचितांसाठी या संस्थेमार्फत काम करायचं आहे. भीक नकोय. स्वतःच्या पायावर उभं राहून ही मदत मिळावी म्हणून. साहस संस्थेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्या माध्यमातून घरात लपून राहणाऱ्या अॅसिड सर्व्हायवर्सचा स्टॉल ताज हॉटेलमध्ये लावण्यासाठी त्यांनी कार्यक्रमाची तयारी केली होती. आयत्यावेळेस स्पॉन्सरर गळून गेल्याने ही मेहनत वाया गेली. ज्या पैशातून अनेक सर्व्हायवर्सच्या उपचारांसाठी मदत झाली असती ते पैसे डोळ्यांदेखत संपले. - दौलतबी खान, अध्यक्ष, सहास फाउंडेशन  

Friday, May 13, 2016

तेव्हा त्याच्या दिसण्याने बातमी रखडली होती


सगळेजण फँड्री आणि नागराज मंजुळे याच्याबद्दल बोलताहेत...मग म्हटलं आपण का गप्प बसावं...हो पण मी फँड्री पाहिलेला नाही.  मात्र, मी नागराज मंजुळेचा इण्टरव्ह्यू घेतलाय.  त्या इण्टरव्ह्यूच्या आठवणी आणि जब्याची गोष्ट मला सारखी वाटली म्हणून हा किस्सा शेअर करण्याचा मोह टाळता येत नाही.  

तेव्हा मी एका चॅनलसाठी एण्टरटेन्मेण्ट बीटसाठी रिपोर्टींग करत होते. त्यावेळी नागराजची भेट झाली.
नागराजने त्याची पिस्तुल्या ही डॉक्युमेंट्री एका स्पर्धेत उतरवली होती.  त्याच स्पर्धेत त्याचा मित्र मिथून चौधरी (पायवाटचा दिग्दर्शक) याची घनदाट ही डॉक्युमेण्ट्री सुद्धा दाखल झाली होती होती. पिस्तुल्या ही पारधी समाजातील एका मुलाची कथा होती. त्यात नागराजने एका पारधी मुलाकडून काम करवून घेतलं होतं. डॉक्युमेण्ट्री काही त्या फेस्टिवलमध्ये पाहण्याची संधी मला मिळाली नाही. पण नंतर मी ती डॉक्युमेण्ट्री मिळालेल्या सीडीच्या आधारे ऑफिसमध्ये पाहिली. दुर्दैवाने ती सीडी आज माझ्याकडे नाही. त्या इण्टरव्ह्यूशी जोडलेल्या काही आठवणी मात्र अजूनही ताज्या आहेत.
चॅनलच्या एण्टरटेण्मेण्टमध्ये डॉक्युमेण्ट्री या विषयाला किरकोळ स्थान असते. त्यातही प्रथितयश माणसाने केलेली डॉक्युमेण्ट्री असेल तर त्या डॉक्युमेण्ट्रीचं नशिब खुलतं.

मी नविनच होते. त्या वयातही माझ्या लेखी सामाजिक विषयाशी बांधिलकी वगैरे गोष्टी आऊटडेटेड नव्हत्या.  तेव्हा घनदाट डॉक्युमेण्ट्री खूप चालली होती अशी बाहेर चर्चा होती. मलाही ऑफिसमधून घनदाट डॉक्युमेण्ट्री केलेल्या व्यक्तीशी बोल असं बजावून पाठवलं होतं. मी मिथूनशी बोलले. तेव्हा, मिथूनने माझी नागराजशी ओळख करुन दिली. आग्रह केला त्याचा इण्टरव्ह्यू घेण्याचा. इण्टरव्ह्यू कसला बाईट. जेमतेम बाईट घेण्याचा अधिकार माझ्याकडे होता. (सविस्तर बोलता न येणं ही मला अडचण वाटते)

एक काळा तरुण, कुरळे केसे खांद्यापर्यंत. सोबत एक मुलगा. दोघेही साध्या कपड्यातले. मी त्या तरुणाचं नाव विचारलं त्याने त्याचं पूर्ण नाव सांगितलं. त्याची डॉक्युमेण्ट्री, कथा सारं काही त्याने सविस्तर सांगितल. एण्टरटेण्मेण्ट शुटवेळी लोकांशी बोलताना येणारा बडेजाव आणि खोटा भाव दोन्ही त्यात मिसिंग होतं. म्हणूनच की काय मीही जास्त वेळ बाईट घेतला.
त्या तरुणाने त्याच्या डॉक्युमेण्ट्रीत प्रमुख भूमिका असलेल्या मुलाची आवर्जून ओळख करुन दिली. याला कॅमेराही माहित नव्हता’ त्या तरुणाने माहिती दिली. तो तरुण भरभरुन बोलला. त्याच्या बरोबर असलेल्या त्या मुलाबद्दल बोलण्यातच त्याला अधिक रस होता.
मी माझ्या नेमाप्रमाणे बातमी केली. डॉक्युमेण्ट्रीचे व्हिज्युअल्स होते. पण पुढचे दोन दिवस बातमी चॅनलवर गेलीच नाही. मी बातमीचा पाठपुरावा केला तेव्हा मला उत्तर मिळालं होतं याला टीव्हीवर कोण बघणार?’एण्टरटेन्मेण्ट बीटचं एक चॅलेंज तेव्हा मला कळलं. बातमीतले बाईट आणि फोनो दोन्हीसाठी माणसं सुंदर आणि ओळखीची लागतात. पण माझ्या लेखी ती डॉक्युमेण्ट्री, डॉक्युमेण्ट्रीचा विषय आणि त्यात पारधी समाजातल्या मुलाने काम केल्याची माहिती या बाबी सुंदर होत्या.

दरम्यान मी ज्या दोन डॉक्युमेण्ट्री केलेल्या तरुणांचा बाईट घेतला होता त्यांनी फोन केला होता. आमची बातमी लागली कामाझ्याकडे नाही हेच उत्तर होते. मी माझ्यापरीने पाठपुरावा सुरू ठेवला. त्या दोन तरुणांच नशिब बदललं एका रविवारने. रविवारी एण्टरटेन्मेण्टची बातमी नव्हती. तेव्हा माझी बातमी लागली. झालं घोडं गंगेत न्हालं.

दोस्तांनो ज्याच्या दिसण्यामुळे बातमी रखडली होती तो पिस्तुल्याचा दिग्दर्शक अं हं तुमच्या लाडक्या फँड्रीचा दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे होता. हे सांगितलं तर आज तुमचा विश्वास बसेल. कारण, आज त्याचा तास –तास इण्टरव्ह्यू घेण्यासाठी लोक रांगा लावत असतील.  
  
(हा ब्लॉग २४ फेब्रुवारी 2014 ला जय महाराष्ट्र वाहिनीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. पण त्यात थोडे बदल करुन पुन्हा हा ब्लॉग पब्लिश करण्याचा मोह मला आवडत नाही. तेव्हा मी त्या वेबसाईटची ईन्चार्ज होते. या ब्लॉगची लिंक पुन्हा 
 )

Thursday, March 3, 2016

तीन महिन्यात किमान 20 वेळा हृदयविकाराचे झटके


तीन महिन्यात किमान 20 वेळा हृदयविकाराचे झटके 
तरिही बाळ सुखरूप 
आई सुशिक्षित असल्यामुळे बाळ वाचले डॉक्‍टरांची प्रतिक्रिया 

सकाळ वृत्तसेवा, 
वृत्तसेवा, 
मुंबई, ता. 2ः अवघ्या तीन महिन्यात बाळाला सुमारे 20 किंवा त्याहून अधिक हृदय विकाराचे झटके आले असावेत असा डॉक्‍टरांचा अंदाज आहे. इतक्‍या बिकट प्रसंगानंतरही अवघ्या तीन महिन्यांची आदिती गिलबिले जिवंत आहे. डॉक्‍टरांच्या म्हणण्यानुसार याचं पूर्ण श्रेय तिच्या आई-वडिलांचं आहे. आई वडील सुशिक्षित होते म्हणून बाळ वाचलं. 

सोलापूर येथील बार्शी मधील गिलबिले कुटूंबात 25 नोव्हेंबरला आदितीचा जन्म झाला. सतत घाम येणे, दूध पिताना तासन तास रडणे, दूध न पिणे या समस्यांमुळे आदितीला डॉक्‍टारांकडे वारंवार न्याव लागत होतं. जानेवारी महिन्यात आदितीला हृदयाचा अत्यंत बिकट आजार असल्याचे उघड झाले. औषधोपचारांनंतरही आदितीमध्ये बदल दिसत नव्हता. सरते शेवटी बार्शीहून आदितीला तिच्या कुटूंबियांनी पूण्याच्या हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात नेले. तिथल्या डॉक्‍टरांनी आदितीवर उपचार होतील पण त्यात तिची जिवंत राहण्याची शक्‍यता कमी असल्याचे सांगितले. तेव्हा आदितीची आई प्रिती गिलबिले यांनी आदितीला मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला. 

खासगी वाहनाने आदितीला मुंबईत आणण्यात आले. नातेवाईकांच्या सांगण्यावरुन एच.एन. रिलायन्स रुग्णालयात तिला दाखल केले. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी आदितीच्या  चाचण्या केल्या असता आदितीवर तातडीची शस्त्रक्रियेची आवश्‍यकता असल्याचे लक्षात आले. त्यानुसार आदितीवर 25 फेब्रुवारीला शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी हृदयातील शुद्ध रक्त फुप्फुसात सोडणाऱ्या धमनीला योग्य ठिकाणी जोडण्यात आले. 9 तासांच्या शस्त्रक्रियेदरम्यान आदितीच्या हृदयाच्या एका बाजूला यंत्राच्या आधारे काम करण्यास प्रवृत्त करण्यात आलं. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. एका वेळी आदितीचे हृदय, फुप्फुसं आणि तिच्या शरिरातील कॅल्शियम, क्षारांचे प्रमाण नियंत्रित करावे लागत होते असे या शस्त्रक्रियेतील प्रमुख डॉ. के शिवप्रकाश यांनी सांगितले. 

अनकेदा आदिती तीन ते चार तास रडायची. कळायचं नाही ती का रडते. तिला आजार होता हे समजलं तेव्हा आदितीला वाचविण्यासाठी आम्ही सात ते आठ डॉक्‍टरांकडे गेलो. बार्शीला शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं कळलं तेव्हा पुण्याला शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेताल. पुण्यात हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात बाळावर उपचार करण्याची तयारी दाखविली पण बाळ वाचण्याची हमी ते देत नव्हते. या रुग्णालयात ती हमी मिळाली म्हणून आम्ही इथे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला डॉक्‍टरांमुळे माझं बाळ वाचलं असे आदितीची आई प्रिती गिलबिले यांनी सांगितले. 

आई शिकलेली होती म्हणून 
एका मुलीला घेऊन बार्शीहून मुंबईत यावं लागणं हे असंघटित आरोग्य सेवेचं लक्षण आहे. आदितीच्या माता-पित्यांनी वेळीच तिला रुग्णालयात आणलं आणि शस्त्रक्रियेचा निर्णय घेतल्याने आदिती वाचली. आदितीचे आई-वडील सुशिक्षित होते त्यातही आई शिकलेली होती म्हणून आदिती वाचली असं मी म्हणेन. आदिती तिच्या वयाच्या सहा महिन्यानंतर आली असती तरी आदितीला जगली नसती. आदितीच्या आजारामुळे तिची शुद्ध रक्त शरिरात सोडण्याची प्रक्रिया मंदावत चालली होती. ज्याचा परिणाम हृदयाच्या काम करण्याचा क्षमतेवर होत होता. आदितीवर वेळीच शस्त्रक्रिया झाली नसती तर आदिती जगली नसती. आता आदिती सर्वसामान्य माणसाप्रमाणे जीवन जगू शकते- डॉ. शिवप्रकाश के. 

चौकट 
आदितीला अल्कापा हा हृदयाचा अत्यंत दूर्मिळ आजार होता. या आजारामध्ये हृदयाची रक्तपुरवठा करणारी धमनी फुप्फुसांमध्ये रक्त सोडत होती. याने हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि हृदयाचे, स्नायू मृत झाल्याने हृदय प्रत्यारोपणाची आवश्‍यकता भासते. 
एकूण हृदयविकारांच्या तुलनेत या आजाराचे प्रमाण .025 टक्के ते 0.5 टक्के आहे. 
तीन लाखात एकाल हा आजार होतो. 
हा आजार झालेले 10 पैकी 9 मुलांचा मृत्यू जन्मानंतर एक वर्षात होतो 
वयस्कर व्यक्तींमध्ये या आजाराला हृदय प्रत्यारोपण हाच पर्याय आहे 

डॉ. श्रीपाल जैन, बालहृदयरोगतज्ज्ञ 

घाम येणे, न जेवणे आणि सतत रडणे या साधारण समस्या आहेत. पण जर मुलाचं वजन वाढत नसेल आणि या समस्या दिसत असतील तर मुलाला हृदयविकार असल्याची शक्‍यता असते. अनेकदा डॉक्‍टरांच्या हे लक्षात येत नाही. अशी बाळ जेव्हा दमतात किंवा रडतात तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका येतो - डॉ. अनिष वोरा 

Monday, February 8, 2016

हेल्मेट सक्ती !


हेल्मेट सक्ती गरजेचीच आहे. तसंच बाईक चालविणा-या व्यतिरिक्त बाईकवर असलेल्यांनाही ही हेल्मेट सक्ती हवी. विशेषतः महाराष्ट्राच्या इतर भागात एका बाईकवर जिथे तीन ते चार जण सर्रास बसून फिरतात तिथे ती फार गरजेची आहे. कारण अशा ठिकाणी ब-याचदा नवरा बायकोबरोबर दोन मुलं किंवा नवरा बायकोबरोबर शेतावर काम करणारे म्हातारे असतात. विचार करा एकावेळी किती प्राण जाऊ शकतात. तसंच लहान मुलांसाठीही चांगल्या पद्धतीची हेल्मेट बाजारात आणणं आवश्यक आहे. 

हेल्मेट सक्तीमुळे आता तकलादू हेल्मेट हायवे आणि रस्त्याच्या कडेला घेऊन बसणारे दिसतील. केवळ हेल्मेट न घालता फिरणा-यांवर कारवाई करण्यापेक्षा असे हेल्मेट विकणा-यांवरही कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. 

विशेषतः शेतातून परतताना संध्याकाळी किंवा रात्री गाडी रस्त्यावर किंवा हायवेवर येताना अनेकजण गाडीने भरधाव रस्ता क्रॉस करतात. अशा वेळेस ब-याचदा अपघात होण्याची शक्यता उद्वभवते.  

हेल्मेट सक्ती बरोबरच  रस्त्यावर चालणा-यांनाही काही नियम घालून दिले पाहिजेत. विशेषतः हायवे किंवा रस्त्याच्या कडेला शेतातून बाहेर येणारे लोक रात्रीच्या वेळी सहसा दिसत नाहीत अचानक गाडीसमोर येतात. ज्या पद्धतीने पायी शिर्डीला जाणारे लोक अंधारात चमकणारं जॅकेट किंवा हातात चालू बॅटरी घेऊन चालतात त्याप्रमाणे पादचाऱ्यांनाही सुचवलं पाहिजे. 


  हेल्मेट सक्तीला समर्थ का देतेय ? 
अपघातात अनेकदा डोक्याला मार बसतो. हा मार मोठ्या प्रमाणावर असेल तर मेंदूला ईजा होते. रस्ते अपघतातात शरिरावर इतर ठिकाणी मोठा आघात झालेला नसला तरी मेंदूला मार लागल्यामुळे मेंदूमध्ये रक्त स्त्राव होणे किंवा मेंदूला सुज येणे अशा समस्या दिसतात. मेंदू मृत होणे किंवा मेंदू कमी काम करणे अशा समस्या उद्भवल्यास त्याने शरिरातील इतर अवयवांवरील मेंदूचे नियंत्रण सुटून अंतर्गत रक्तस्त्राव होतो. ज्याने मृत्यूच्या शक्यतेत वाढ होते.  


(स्वतःच्या गाडीतून वर्षभर प्रवास करताना या गोष्टी सुचल्या. पण हेल्मेट सक्तीने निमित्त दिलं.)

Sunday, January 10, 2016

सेक्स, सेल्फी आणि सोशल मीडिया


सेल्फी काढणं हा आजार बळवण्यामागे सोशल मीडिया, स्मार्ट फोन यांबरोबर फॅशन आणि ट्रेण्डचं अंधानुकरण तसंच प्रसिद्धीची आणि स्तुतीची भूक असल्याचं दिसून येतं. लाईक्स, कमेंट्स या सोशल माध्यमांच्या दोन शब्दांभोवती मग सगळं भावविश्व उधळलेलं दिसून येतंय सध्या. 
पण म्हणून सेल्फी काढणं वाईट मुळीच नाही. सेल्फीचा अतिरेक आणि त्यासाठी जीव धोक्यात घालणं वाईट असं तज्ज्ञांच मंत आहे. पण आपण फॅशन आणि ट्रेण्ड या शब्दांनी निर्माण केलेल्या शर्यतीसाठी किती पळावं याला बंधन असण्याची देखील आवश्यकता निर्माण झाली आहे हे या निमित्ताने वाटू लागलंय. जे सेल्फी आणि त्यातून होणा-या अपघातांच्या माध्यमातूून अधोरेखित होत आहे. ज्याप्रमाणे इन फॅशन असलेला एखादा कपड्याचा प्रकार आपल्याला, आपण जात असलेल्या कार्यक्रमात किंवा वातावरणात शोभून, उठून दिसेल हा विचार दुय्यम असतो त्याप्रमाणे सेल्फीचं झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. सेल्फीच कशाला एकूणच फोटो काढण्याचं वाढणारं फॅड याच पद्धतीत मोडतं. यात केवळ आनंदाचा, किंवा महत्त्वाचा क्षण टिपणं एवढंच नाही. तर, तो सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याची आणि त्यातून स्तुती आणि प्रसिद्धी मिळविण्याची भूकही कारण आहे. किंवा केवळ सेल्फी हे वेढ नाही तर प्रसिद्धी आणि स्तुतीसाठीचा हपापलेपणा देखील याला कारण ठरु लागलंय. की आपण सोशल माध्यमांवरही शर्यत निर्माण केलीय? पहिली सेल्फी कोण टाकतं? दिवसभरात जास्त अपडेट्स कोण देत? वेगळ्या आणि चांगल्या ठिकाणी जाऊन सेल्फी किंवा फोटो कोण काढत याची शर्यत आहे का ही ?
सेल्फी पॉइंट्सही काही ठिकाणी तयार झाले. ते जेव्हा तयार झाले तिथे जाऊन किंवा तिथे गेल्यावर अनेकांनी फोटो काढले. पण काही तरी वेगळ करण्याच्या नादात असे जीवावरचे खेळ केले जातात. 
सेल्फी हा  सेक्स अपिलिंगचा भागही ठरू लागलाय का?. तोंडाचा चंबू (पाउट) करुन  फोटो काढणं हे एकेकाळी सेक्स सिंबॉल मानलं जायचं. मेरलिन मेन्रोचा फोटो आठवा. हल्ली तसे पाउट करुन किंवा डक लिप्स, स्परो फेस करुन सेल्फी काढण्याचे प्रकार मुलींमध्ये सर्रास दिसताहेत. कदाचित त्यांना या पाउटचा अर्थ माहित असावा किंवा नसावा पण ते होताना मात्र दिसतंय. किती पालकांना असे ओठांचे चंबू का केले जातात हे माहित आहे ? किती पालकांना असं ओठांचे चंबू करुन फोटो काढण हे चुकीचा सिग्नल देणारं आहे हे माहित आहे?  
केंब्रिज ऑनलाईन डिक्शनरीत पाऊटचा मिळालेला अर्थ  (to ​push the ​lower ​lip ​forward to show you are ​annoyed, or to ​push both ​lips ​forward in a ​sexually ​attractive way)